दधि मधुरं, मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधाऽपिमधुरेव…
आयुर्वेदात तीन महान औषधी, दैनंदिन उपयुक्ततेची, रोजच्या व्यवहारात सहज मिळणारी, सुलभपणे वापरता येणारी द्रव्ये सांगितली आहेत. मध हे समस्त कफविकारावर व काही प्रमाणात पित्तविकारावर उपयुक्त, तात्काळ गुण देणारे हुकमी प्राणिज द्रव्य आहे. मध चवीने गोड व तुरट, स्वभावाने अति रूक्ष, सूक्ष्म, शरीरात कोणत्याही भागात खोलवर पोहोचणारा आहे. मधाच्या अनेक गुणांपैकी जुळवून आणणे किंवा संधान करणे, तसेच शोधन करणे, उलटी थांबवणे व उलटी करवणे अशा परस्परविरोधी गुणांचा उपयोग रोग बरे करण्याकरिता होतो. मध बल देतो. तसेच फाजील चरबी कमी करतो. मध अग्निवर्धक व मलावष्टंभ करणारा आहे. मध गुणाने कोमल आहे. त्यामुळे शरीराची कांती सुधारण्याला मदत होते. मधामध्ये हृदयाला बल देणारे गुण आहेत. विशद गुणांच्या द्रव्यात मध अग्रभागी आहे.
आपल्या देशात मधाचा माणसागणिक वापर नगण्य आहे. युरोप अमेरिकेत मध शरीरात फाजील चरबी न वाढवता ताकद देणारे मधुर रसाचे टॉनिक म्हणून वापरतात. साखरेचे दुर्गुण मधात नाहीत. त्यामुळे स्थूल व्यक्तीकरिता मध उपयुक्त आहेच.
त्याबरोबर त्याने हृदयरोग, चरबीचे विकार, प्रमेह, जडपणा इत्यादी फाजील पोषणाचे विकार बरे होतात. मधाच्या प्रत्येक कणात, बाहेरच्या आवरणात रूक्ष हा गुण प्रकर्षाने आहे. या एका गुणामुळेच मधाची खरे-खोट्याची परीक्षा करणे सोपे आहे. एक कोरे फडके घ्यावे. त्याची खळ काढलेली नसावी किंवा मांजरपाट वा हारक कापडाचा तुकडा घ्यावा. ते फडके तिरके धरून त्यावर आपणास परीक्षा करावयाची असलेल्या मधाची धार सोडावी. त्या कपड्याला न चिकटता मध खाली घरंगळत गेला तर तो खरा मध. जर त्या मधाचे थेंब फडक्याला चिकटून राहिले तर खोटा मध होय.
मधाची आणखी दोन प्रकारे साधी सोपी परीक्षा करता येते. मधामध्ये कापसाची वात करून बुडवावी. ती तडतडली नाही, सावकाश जळली तर तो मध खरा होय. मधाचा थेंब पाण्यात टाकला असता तसाच्या तसा तळात गेला तर तो खरा मध असे मानतात. पण चेरापुंजीसारख्या (मेघालय) खूप पावसाच्या प्रदेशातील मधाला ही परीक्षा लागू पडत नाही असा माझा स्वानुभव आहे. मधाचा थेंब जिभेवर ठेवला तर काहींना ‘वमीकरोति’ या उक्तीप्रमाणे उलटीची भावना होते.
मधामध्ये काकवी, गूळ अशी वेगवेगळी भेसळ द्रव्ये असू शकतात. शरीरात पोटात, आतड्यात, रस-रक्तवाहिन्यांत जिथे जिथे मध पोहोचेल तेथील बारीकसारीक कफाचा फाजील दोष मध शोषून घेतो. मध सूक्ष्म गुणांमळे शरीरातील सर्व सर्व वहनयंत्रणेत पोचतो. आपल्या या विलक्षण गुणाने शरीरात ठिकठिकाणी पडून असणाऱ्या मलद्रव्यांचे शोधन, क्षरण ही कार्ये मध करतो. मध हा केवळ एनर्जी देतो. फाजील वजन देत नाही. मात्र याकरिता मध प्यावा लागतो. तो चमचा दोन चमचे घेऊन चालत नाही.