
अकोला दि. 5 ऑगस्ट – अकोला तालुक्यातील खेकडी गावात आज सकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीत चार शेतकरी कुटुंबांची घरे जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे शेतीसंबंधित साहित्य, धान्य, घरगुती वस्तू आणि इतर मालमत्ता भस्मसात झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि स्थानिक पातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अकोला येथून बोलावण्यात आलेली अग्निशमन दलाची गाडी मात्र रस्त्यात बंद पडल्याने वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली नाही. परिणामी गावातील नागरिकांनीच धाडस दाखवत आग विझवली. या घटनेमुळे गावात भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले असून पीडित कुटुंबांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.