
मूर्तिजापूर(प्रतिनिधी): शासनाच्या दोन महत्त्वाकांक्षी अभियानांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज, १७ सप्टेंबर २०२५ रोजी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभांमध्ये ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग यांच्या प्रमुख अभियानांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानग्रामविकास विभागामार्फत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ १७ सप्टेंबर २०२५ पासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राबवले जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढवणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हा आहे. ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी लोकांचा सहभाग वाढवणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान (सेवा पंधरवाडा)याचसोबत, महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत ‘सेवा पंधरवाडा’ (१७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५) तीन टप्प्यांमध्ये सुरू झाला आहे. * पहिला टप्पा: १० सप्टेंबर २०२५ रोजी ४१ महसुली गावांमध्ये ‘शिवार फेरी’ घेण्यात आली होती. या फेरीत पाणंद व वहिवाटीचे रस्ते शोधण्यात आले. ग्रामसभेत गाव नकाशावर अस्तित्वात असलेले आणि नोंदी नसलेले रस्ते वाचून दाखवण्यात आले. नागरिकांना अतिक्रमणे स्वतःहून काढण्याचे आवाहन करण्यात आले. यापैकी ८ गावांची अतिक्रमित रस्त्यांची मोजणी करून सीमांकन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. * दुसरा टप्पा: २३ ते २७ सप्टेंबर २०२५ या काळात ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पट्टेवाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. * तिसरा टप्पा: २८ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये लोकअदालती व जनसंवाद आयोजित केले जातील.या दोन्ही विभागांच्या अभियानांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या अभियानांमुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.