व्हीआयपींवरील हल्ल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई हादरली. सलमान खान, बाबा सिद्दीकी आणि आता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. या हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने वार करण्यात आले ते पाहता, यामागे धार्मिक कट्टरता असलेला व्यक्ती तर नाही ना? अशी शंका आव्हाड यांनी व्यक्त केली. त्यांनी एकूणच या सर्व प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट केले आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेवर चांगलेच तोंडसुख घेतले. जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाय प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात, असा सवाल त्यांनी ट्वीटमध्ये विचारला आहे. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्वतःला विचारायला नको का? असा टोला त्यांनी लगावला.
अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही, असे आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे………….