Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आंदोलनाला बसले आहेत. उपोषणाची सुरुवात करताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. तसेच, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळेपर्यंत लढणार, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उद्या 26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे. शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करून नोंदी सापडून देण्याचे काम करावे. आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावे, या सह आठ-नऊ मागण्या आम्ही सरकारकडे सादर केल्या आहेत. आमच्या नवीन मागण्या नाहीत, या जुन्याच मागण्या आहेत, असे त्यांनी म्हटले.